Saturday, 19 March 2022

श्रीराम मंदिर नगरदेवळे (भाग-1)

 

🚩













श्रीराम मंदिर नगरदेवळे (भाग-1) 🚩
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेले नगरदेवळे ! तीस हजार लोकवस्तीचे गाव . आजूबाजूला बावन्न खेड्यांची वस्ती. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. जमीन सुपीक व पाण्याची मुबलकता त्यामुळे फळबागांची रेलचेल . सगळा महाराष्ट्र कोरडा झाला तरी येथील शेती पाण्यावाचून करपली असे कधीच झाले नाही. कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातून येथील शेती सुखरूप बचावली. शेतीने गावाला कधीच उपाशी राहू दिले नाही.
व्यापारी बाजारपेठ असल्याने दुय्यम व्यवसाय म्हणून लोक व्यापाराकडे वळले. शेतीपूरक व्यापार हाच मुख्य उद्योग ! गावाला धार्मिक परंपरा आहे तशी ऐतिहासिक परंपरा पण आहे .सरदार केरोजी पवार यांना छत्रपती राजाराम महाराज यांचे कडून "सेनाबारासहस्री " हा किताब व नगरदेवळे हे गाव जहागीरी म्हणून मिळाले तेव्हापासून गावाचे लष्करी महत्त्व वाढू लागले.
भडगाव परगण्यातील नगरदेवळे सह 16 गावांची जहागिरी त्यांना मिळाली. त्यांनी गावाच्या मध्यभागी गढीवजा वाडा बांधून घेतला. त्याच्या चार दिशांना भक्कम बुरुज बांधून कोट वळवला . तसेच गावाच्या बाहेर दिशांना नगरकोट बांधून गणपती दरवाजा, भडगाव दरवाजा व गाळण दरवाजा असे तीन दरवाजे यांनी गाव बंदिस्त केले.
वाड्याच्या आग्नेय दिशेला गाळण दरवाज्याजवळ श्रीमंत सरदार पवार महाराज यांनी श्रीराम मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराचे बांधकाम नेमके केव्हा झाले हे निश्चित माहित नसले तरी मंदिराची स्थापत्यशैली पाहता सतराशे पन्नासच्या आसपास मंदिराचा कालखंड असावा असे वाटते. कारण पुण्यातील भवानी पेठेतील छत्रपती शाहू उर्फ जंगली महाराज यांचे समाधी मंदिर याच प्रकारचे आहे.
श्रीराम मंदिर आजही श्रीमंत सरदार पवार यांच्या खाजगीतील आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत सरदार शिवराव पवार उर्फ " मोठे महाराज " यांनी इ. सन 1935 च्या आसपास केला. या मंदिराच्या बाह्य कमानी पक्क्या विटा व चुन्यात बांधलेल्या आहेत. त्यावर मराठवाडा शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार फूट उंचीचा दरवाजा आहे. त्यामुळे आत वाकून जावे लागते. आत प्रवेश केल्यावर पुन्हा चार पायर्या उतरून मुख्य मंदिराकडे जावे लागायचे.
मुख्य मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पक्क्या दगडात मचवलेला होता. प्रदक्षिणा मार्ग बराच विस्तृत असून तिथे छोटेखानी पटांगण आहे. पंचवीस तीस लोक सहज बसतील अशी व्यवस्था आहे. कदाचित त्याकाळी छोटेखानी प्रवचन, भजन, कीर्तन हे राजघराण्यातील स्त्रियांसाठी व महिलांसाठी येथे होत असावे. मंदिरात प्रवेश करताना पुन्हा चार पायर्या वर चढून जावे लागत असे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गापासून मंदिराची उंची 30 फुटांपेक्षा अधिक आहे. मंदिर शिखरापर्यंतचे काम दगडी फरसबंदीत व शिखरावरील काम हे विटा व चुना यात केलेले आहे. शिखर अष्टकोनी आहे त्यावर कमळ पाकळ्यांची रचना केली असून सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आठही दिशांना देवकोष्ठ रचना असुन गोलाकार कळस डोळ्यात भरून दिसतो.
मंदिराचे नाव श्री राम मंदिर असले तरी मंदिरात प्रवेश केल्यावर समोर विष्णू लक्ष्मी मूर्ती लक्ष वेधून घेते. गदा, पुष्प, शंख, चक्र धारण केलेली ही विष्णू मूर्ती विष्णू ध्रती या नावाने ओळखली जाते. विष्णू सोबत जी शक्ती असते तिला विष्णू सोबतच विशिष्ट नावाने ओळखले जाते. भारतीय मूर्तीशास्त्रात विष्णुमूर्ती 24 प्रकारच्या आहेत. विष्णूच्या हातातील आयुधांचा क्रम जसा असेल त्याप्रमाणे त्या मूर्तीचे व त्यासोबतच या शक्तीचे नामाभिधान असते. अशी माहिती प्रसिद्ध मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो.ब.देगलूरकर यांच्या पुस्तकात मिळते.
विष्णुमूर्ती पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात कोरली आहे. पायथ्याशी जय विजय हात जोडून उभे आहेत. हनुमानाची दीड फूट उंचीची मूर्ती लक्ष्मीच्या पायाजवळ आहे. या मूर्तीवर रंगकाम नंतरच्या काळात केले असावे, कारण ऑइलपेंटचा रंग ठळकपणे जाणवतो. विष्णू व लक्ष्मी यांच्या नेत्रांचा आकार कमलनयन प्रकारातील आहे. मंदिरात अनेक प्रकारच्या मूर्ती नंतरच्या काळात आणून ठेवल्याचे जाणवते.
डाव्या बाजूला उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते . गणेशाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी- सिद्धी गणरायावर चवर्या ढाळत आहेत. पायथ्याशी मूषक मोदक घेऊन गणरायाकडे पाहतो आहे. गणराय कमल पुष्पावर पद्मासनात विराजमानअसून चतुर्भुज आहे. पैकी डाव्या हातात पाश व पुष्प तर उजव्या हातात परशू व मोदक पात्र आहे. खांद्यावर सर्पराज जानवे बनून पहारा देत आहे. मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. अशा दोन मूर्ती नगरदेवळयात आहेत. पैकी एक श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथे आहे याच प्रकारची मूर्ती भडगाव येथील गणपती मंदिरात देखील आढळते .
पहिले बाजीराव पेशवा उत्तरेत मोहिमेवर आले असताना त्यांनी या मूर्तीची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. भडगाव येथील एक नगरदेवळे येथे दोन गणेश मूर्तींची स्थापना एकाच वेळेस झाल्याचे नाकारता येत नाही.
गणेश मूर्तीच्या शेजारी गोवर्धन गिरीधारी ही काळ्या बसाल्ट खडकापासून घडवलेली अप्रतिम मूर्ती आहे. मूर्तीच्या एका बाजूस गोप व दुसर्या बाजूस गोपिका असून सर्व गोपालांनी गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी काठ्यांचा टेकू दिलाय. श्रीकृष्णाने डाव्या हाताच्या केवळ करंगळीने गोवर्धन उचलल्याचे मूर्तीच्या कोरीवकामात साकारले आहे. मूर्तीच्या कोरीव कामातील तुकतुकीतपणा मूर्तिकारांचे प्रचंड परिश्रम दर्शवितो. मुकुटावरील मोरपिसांची नक्षी करताना कलावंताचे कसब पणाला लागले आहे.
डोक्यावरील गोवर्धन पर्वताचा वापर मेघडंबरी छत्रीसारखा केला आहे. आतले कोरीव काम करताना कमालीचा नाजूकपणा साधला आहे. गोवर्धन पर्वत साकारताना कलाकाराने कमाल केली आहे. दोन फूट लांबी-रुंदीचा क्षेत्रफळात सगळा गोवर्धन उतरण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. रासलीला करणारी गोपगोपी , त्यांच्या डोक्यावर असलेला वनक्षेत्रपाल, उजव्या अंगाला सवत्स धेनु, गुराखी, मोर, सिंह, बैल, कोल्हा, अजगर तर डाव्या अंगाला वानर सेना, रानगवा, वाघ, हरिण, खारुताई, मोर, हत्ती, माहूत यांच्यासोबत जंगलातील वृक्ष, पाने, फुले, फांद्या ही संपदा बारकाईने टिपली आहे.
हे सगळे बघताना मन थक्क होते. मूर्तिकारांच्या प्रचंड मेहनत तिला वारंवार प्रणाम करावासा वाटतो. हे तयार करण्याअगोदर कितीतरी आरेखने त्यांना कागदावर उतरवावी लागली असणार !
या मंदिरातील चौथी कलाकृती म्हणजे राधाकृष्ण मूर्ती ! या मूर्तीला सुबकपणा देताना मूर्तीकाराने अक्षरशः जीव ओतला आहे. वेणूनाद करताना हातांची ठेवण व पायांची त्रिभंगी मुद्रा यांचा अद्भुत समतोल साधला आहे. मूर्तीचे सौष्ठव, कमनीयता लाजवाब आहे. अर्ध पाय जमिनीवर ठेवताना गुडघ्यापासून पायाला दिलेला वाक, जमिनीला सरळ दिशेला दुमडलेली बोटे , मूर्तीत सजीवता निर्माण करतात. मुख्य पाषाणातून मूर्ती साकार करताना कलाकारांचे कसब पणाला लागले आहे.
कोरीव काम करताना हळूहळू चारही बाजूंनी मुख्य पाषाण बाजूला सारत फक्त मूर्तीच तेवढी बाकी ठेवली आहे. कमरेच्या दुशाल्याचे अग्रभाग धावते ठेवले आहेत. त्यामुळे मूर्तीत गतिमानता निर्माण झाली आहे. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे मूर्ती अधांतरी न राहता तिला मजबुती मिळाली आहे. या मूर्तीचे निर्माण कार्य पाहता अखंड पाषाण शिळेतून ही मूर्ती या ठिकाणीच घडवली गेली असणार. कारण या मूर्तीचा नाजूकपणा लक्षात घेता तिची ने आण करणे खूप जिकरीचे झाले असते.
मूर्तीच्या उजव्या बाजूला गोपिका चवरी ढाळत असून तिच्या पायाजवळ उभा असलेला गाईचा बछडा पायाभोवती लडीवाळपणे गिरकी घेतोय तर डाव्या बाजूला राधा आशीर्वाद देताना दाखवली आहे. राधेचा लाजरेपणा व चेहऱ्यावरील लज्जाभाव मूर्तीकाराने अचूक टिपला आहे. उजव्या बाजूने डोक्यावरील पदर पुढे ओढला आहे जेणेकरून कृष्णाने चोरून तिच्याकडे पाहू नये व तिची कृष्णाशी दृष्टादृष्ट होऊ नये. चेहर्यापेक्षा बाहेर आलेला पदर दर्शविण्यासाठी मूर्तिकारांनी तिथे उठाव दिला आहे. राधाकृष्ण मूर्तीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव मुख्य विष्णू मूर्तीला देखील मागे टाकतात.
या मंदिरातील पाचवी मुर्ती ही गोविंद पुष्टी या प्रकारातील आहे. विष्णूच्या हाती असलेल्या आयुधांचा क्रम चक्र गदा पद्म शंख असा आहे त्यावरून विष्णूच्या चोवीस मुर्ती प्रकारांपैकी ही गोविंद पुष्टी या नावाने ओळखली जाते. विष्णूच्या गळ्यापर्यंत रुळणारे कुंतल केस मूर्ती सौंदर्य वाढवतात.
( क्रमशः )
भाग - 2 लवकरच !😊
🛑🌾© संजीव बावसकर
नगरदेवळे
जळगाव
9975281275
( हे सदर आपणांस कसे वाटले, लाईक करा, कमेंट करा,आवडल्यास असेच पाठवा. हक्क सुरक्षित .)

Friday, 18 March 2022

मराठ्यांच्या रामभक्त सेनापतीची रघुजी भोसले समाधी

 








मराठ्यांच्या  रामभक्त सेनापतीची रघुजी भोसले समाधी




मराठ्यांच्या पराक्रमी सरदारात ज्यांनी स्वराज्यातून साम्राज्य उभे केले त्यातील नागपूरकर रघुजी भोसले अग्रणी म्हणावे लागतील. इ.स. १७४० ते १७५१ या बारा वर्षांत रघुजींनी स्व पराक्रमाने बंगालवर मुर्शिदाबादेवर बऱ्याचदा अनेक स्वाऱ्या करून बंगालचा पश्चिम भाग व ओरिसा हे प्रदेश जिंकले. मीर हबीबला हाताशी धरून अलिवर्दीखानावर वचक बसवला. रघुजीराजांचा अंमल वऱ्हाडपासून ओडिसापर्यंत आणि गढा मंडलापासून चांद्या पर्यंत पसरला होता. रघुजींचे स्वभावदर्शन आपल्याला वाचायला मिळते ते असे :-
"रघुजी बुवा शिपाई दोस्त. एक पैसा जवळ न ठेविता तमाम खर्च फौजास देऊन फौजेस रजावंतीने ठेवीत होते व अडचणीचे प्रसंगास कोणासही शब्द टाकिल्यास माघारे घेत नव्हता. व कूच मुक्काम कोणासच कळवू नये. हर वख्त म्हणत असावे 'जे राम करील ते खरे'. जवामर्दी जातीनी करावी. ऐशाराम बिलकूल नाही. घोड्यावरच भाकर खावी..... "
मृत्यूसमयी रघुजींचे वय ६० च्य वर होते.बंगालच्या स्वारीनंतर रघुजींनी हळूहळू राजकारणातून अंग काढायला सुरुवात केली. वऱ्हाडात तेव्हा "दोअमली मुलूख" चालत असे. हुकूमत निजामाची असली तरी चौथाई, सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांकडे होते. निजामाचा त्रास हा नेहमी करीताच होता.त्यात रघुजींचा स्वभाव स्वतंत्र वृत्तीचा. बाजीरावांच्या काळापासून ते नानासाहेबांच्या काळा पर्यंत त्यांचं पेशव्यांशीही कधी पटलं नाही. पुढे शाहू महाराजांनी पेशव्यांना व भोसल्यांना आपापलं कार्यक्षेत्र ठरवून दिलं. शाहू महाराजांची रघुजीवर विशेष मर्जी म्हणून महाराजांनी आपली चुलत मेव्हणी सुकाबाई त्यांना देऊन संबंध अधिक दृढ केले हाेते. शाहू महाराजांच्या या जवळच्या नातलगाला दुखावून चालणार नाही म्हणून पेशव्यांनीही पुढे नमतं घेतलं.
नानासाहेब पेशव्यांनी रघुजींचे मृत्यूचे वर्तमान समजल्यावर लिहिले ...
"(रघुजी भोसले) मातब्बर सरदार होते वाईट गोष्ट जाहली होणार ईश्वर इच्छा प्रमाण अलीकडे आमचे कामाचे फार होते."
रघूजीला पोटदुखीचा आजार होता, 'बाबासाहेबांची प्रकृति बिघडली तेव्हां राज्यकारभाराचे कितीएक प्रकार बाबूराव याजला एकांत घेऊन करावे. आज्ञा झाली की, तुम्ही आम्हांस पुत्रवत् आहा, तेव्हा आम्हाजवळ रात्रंदिवस राहत जाणे. श्रीमंत जानोजी भोसले यांनीही जवळ राहावे. या उभयतांस दौलतीचे सर्व कारभार ते समजावून देऊन स. ११६३ फसली साली फाल्गुन शु० ३, श० १६७६, ता. १४ फेब्रु०, स. १७५५ या दिवशी देवाज्ञा झाली. सहा स्त्रिया व सात दासी अशा तेरांनी सहगमन केले. सेनासाहेबसुभा पद जानोजीस व इतरांस कांहीं सरंजाम मृत्युपूर्वी रघूजीने ठरवून पेशव्यांनी ते चालवावे असे कळविलें ; आणि इतर सरदारांप्रमाणे पुत्रांनी राज्याचा उद्योग करावा असे त्यांस कळकळीने बजाविलें'.
मराठ्यांच्या या रामभक्त सेनापतीची समाधी आज बरिच एकांतात आहे. धड दिवाबत्तीची सोय नाही अशी तिची गत आहे. लोकं एकवेळ पराक्रम विसरतील मात्र इथे तर रघुजीराजेंच नावही विसरलेत. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारातून शिरल्यानंतर उजव्या हाताकडे कोपऱ्यात आद्य रघुजींची सर्वात मोठी आणि उंच समाधी आहे. ही समाधी किंवा छत्री ११.५० मी. लांब आणि ११.५० मी. रुंद आहे. प्रत्येक बाजूला पाच त्रिकोनी कमानी अशा एकूण २० कमानी आहेत. ही समाधी पूर्वाभिमुखी असून प्रथम टप्पा चढण्याकरिता पाच पायऱ्या आहेत. २.४० मी. बांधकाम प्रत्येक बाजूस आहे. एकंदर २८ खांब भिंतीत बसविलेले आहेत. मध्यावर मुख्य समाधी आहे. या इमारतीची सर्व बांधणी पूर्णपणे दगडाची आहे. दगड वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने सौंदर्यात भर पडली आहे. मध्यवर्ती घुमटावर माकडांच्या शिल्पाकृती आहेत. हा प्रकार परकीय वास्तूबाबत आढळतो. या समाधीवर बंगालमधील मुस्लिम शिल्पकलेचे प्रतिबिंब पडलेले आहे.
संदर्भ :- १) नागपूर जिल्हा गॅझिटिअर :- भाग :- २
२) मराठी रियासत खंड :- ४
३) नागपुर प्रांताचा इतिहास :- या.मा.काळे
_पृथ्वीराज धवड

बनशंकरी मंदिर , अमरगोल, हुबळी , कर्नाटक

 
























बनशंकरी मंदिर , अमरगोल, हुबळी , कर्नाटक
Location: Banashankari Temple Amargol
कर्नाटकातील देवलयाबाबत माझा एक अनुभव आहे. अगदी दाट गजबजलेल्या वस्तीत असली तरी ती बऱ्याचदा अतिशय नीटनेटकी राखलेली आढळतात. हे देवालय अर्थात अपवाद नाही..वस्तीतील घरांच्या तुलनेत मजबूत अशा 15 फूट उंचीच्या प्रशस्त चौथऱ्यावर हे देवालय उभे आहे.भर वस्तीत असूनही शांत, निवांत. धारवाड - हुबळी हम रस्त्यापासून अगदी शे दोनशे यार्डवर....
द्विकुट प्रकारचे हे देवालय अकराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात उभारलेले आहे. दोन्ही गर्भगृह एकमेकास काटकोनात असून ती पूर्व आणि दक्षिणमुखी आहेत. प्रत्येकास अंतराळ , अर्धमंडप आहे ,जे पुढे एक महा मंडपात उघडतात.महा मंडपात चार अतिशय सुंदर सालंकृत स्तंभ असून त्यावर अतिशय नाजूक कलाकृती करण्यात आली आहे. याच स्तंभांवर अप्रतिम अशी उग्र नृसिंह , शिव,वराह ,भैरव ,भैरवी ,गणेश ,नटराज , विष्णु , बैताली , आदी शिल्पे कोरलेली आहेत.हीच शिल्पे या देवालयाचे वैशिष्ठ्य आहे.
पूर्वाभिमुख गर्भात नंतर केंव्हातरी स्थित केलेले भैरवी शिल्प असून दक्षिणमुखी गर्भगृहात शिवपिंडी आहे. देवालयाच्या बाहेरील भिंतीवर फारशी शिल्पे नसून कळस एकच आणि खूपच जीर्ण अवस्थेत आहे...
मंदिरातील शिल्पावरून हे देवालय केशव आणि भैरवास समर्पित होते असे आढळते . एकूणच मुख्य रस्त्याच्या जवळ असल्याने आणि अगदी तासाभराचा अवधी असला तरी ते आपणास नीटनेटके पाहता येते.
क्रमशः
सुधीर निगडे
पुणे
१० फेब्रवारी २०२२

।।कारेगाव ,एक ऐतिहासिक गाव।।* पुणे

 *


।।कारेगाव ,एक ऐतिहासिक गाव।।* पुणे -नगर हायवेवर पुण्यापासुन अवघ्या एका तासाच्या अंतरावर असलेल,शिरुर तालुक्यातल एक गावाजलेल गाव ,एका बाजुला रांजणगावचा गणपती तर दुस-या बाजुला शिवतिर्थ रामलिंग यांना जोडणार गाव ,औद्योगिक क्रांति नंतर जगातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना उद्योगासाठी ,इत्पादनासाठी महत्वाची ठरलेल्या रांजणगाव औद्योगिक विकास महामंडळाच्या आश्रयाला एैश्वर्य संपन्न,आदर्श,स्वच्छ गाव म्हणजे* ‘कारेगाव’*। याच कारेगावाला एक वेगळ ऐतिहासिक महत्व मात्र झालय ते म्हणजे कारेगावच ग्रामदैवत असलेल्या *कारेश्वर* देवस्थानामुळे आणि गावातील *चतुर्भुज विरगळी*मुळे. कारेगावामधे प्राचीन असलेल आणि पुणेनगर हायवेच्या बाजुलाच असलेल ग्रामदैवत कारेश्वर म्हणजे भगवान महादेवांच पुरातन आणि सुरेख अस देखण मंदिर,जाणा-या येणा-या लोकांच्या मनाला प्रसन्न करते आणि नकळत हात जोडले जातात ते महादेवांना वंदन करण्यासाठी ! कारेगाव ग्रामपंचायतीने अतिशय सुरेख अशी सजावट करुन आणि मंदिर परिसरात झाडे लावुन एक प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचाच परिणाम म्हणुन कारेगावात राहणारा प्रत्येक माणुस मग तो मराठी असो,गुजराती अस

#चोपणी/भुरणा_किंवा_पेटण

 


#चोपणी
/भुरणा_किंवा_पेटण
२०व्या शतका पासुन राहणीमान बदलु लागल,दगड,माती कुडाच्या शेणानं सारवलेल्या घरांची जागा सिमेंट क्राँक्रेट नी मजबुत बंगल्यांनी घेतली.घरातली सारवलेली भुई नामशेज झाली आणी चकचकीत स्टाईल फरशी घरात अंगणात आली आणि याच बदलत्या राहणीमानासोबत एक एक करत ग्रामीण जीवनातील महत्वाच्या वापराच्या वस्तु सुध्दा लोप पावत गेल्या,त्यातील एक लाकडी वस्तु म्हणजे #चोपणी.
साधारण सणासुधीच्या काळात घराभोवतालच अंगण हे माती मुरुम टाकुन चांगल मऊ केल जायचं याला भुई करणं म्हणायचे.अंगणात टाकलेली माती मुरुम घट्ट बसुन अंगण मजबुत व एकसारख चोपुन त्याला मऊ केल जायचं आजच्या आधुनिक काळात धुम्मस मशीनने(वायब्रेटर) धुम्मसुन घराची अंगण किंवा घरातील भुई मजबुत करुन त्यावर फरशी बसवतात पण पुर्वी मशीन नव्हत्या त्यावेळी माणुस आपल्या गरजेनुसार वस्तु निर्माण करत गेला त्यातुनच उदयास आलेली एक वस्तु म्हणजे #चोपणी.
अजुनही ग्रामीण भागात गाई गुरांच्या गोठ्यात मुरुम टाकुन चोपणीने चोपुन एकसारखी भुई तयार करतात तर घरात फरशी बसवण्यापुर्वी मुरुम चोपणी ने चोपतात.
#चोपणी ही एकाद्या मजबुत लाकडाच्या ओंडक्यापासुन बनवतात,ओंडका तासुन त्याला खालुन सपाट तर वरुन अर्धगोलाकार किंवा सपाट निमुळत्या आकाराची असते तिला पकडण्यासाठी मागील बाजुला एक दांडा असतो तो सुध्दा चोपणीच्या ओंडक्याला कोरुन मजबुत बनवलेला असतो कुठलीहि जोडदुरुस्ती नसते.एका अखंड लाकडी ओंडक्यापासुन एक ,दिड व दोन फुटापर्यंतच्या चोपण्या सुतार एकदम कौशल्याने बनवुन देत.
#चोपणीला काही भागात #भुरणा तर काही भागात #पेटण असं म्हणतात.
आजही ग्रामीण जनजीवणात चोपणी वापरली जाते ब-याच शेतकरी व पशु धन बाळगणा-या कुटुंबांकडे गोठ्यातील भुई करायला चोपणीच वापरली जाते कारण चोपणीने हवं तस अंगण किंवा भुई तयार करता येते,चोपणी मुरुमावर आपटुन जेव्हा जमीन चोपण्याच काम चालु असतं तेव्हा चोपणी जमीनीवर आपटली की एक भारदस्त संगीत तयार होते त्याचा धप्पाक धप्पाक आवाज खुप मस्त असतो.
ग्रामीण जीवनात अशा खुप वस्तु आहेत ज्यांचा वापर बंद झाला असला तरी पण त्या मनाच्या एका कोप-यात पडुन आहे त्यांच संवर्धन करण ही काळाजी गरज आहे.मला आठवतय अस आमच्या घरात आजोबा आवर्जुन चोपणी बनवुन आणायचे आजही आमच्याकडे नविन व नुकतीच वर्षापुर्वी बनवलेली मजबुत चोपणी आहे.शेजारी व गावातील लोकं तिला कधीकधी घेउन जातात परत मलाच आणायला जावं लागतय.
✍# मंगेश_गावडे
📲 #८२७५६९४१४४

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...