चंद्रगुप्त मौर्य : मौर्यसाम्राज्याचा संस्थापक
(इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू.२९८)
postsaambhar ::Dt Sitaram Ingole
इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. १८७ ( मौर्य कालखंड) या काळात मौर्य घराण्याचे राज्य होते.
मौर्य वंशाच्या स्थापनेने भारतात एक नवे युग सुरू झाले. संपूर्ण भारत हा मौर्यांच्या अधिपत्याखाली आल्याने भारताचे राजकीय ऐक्य निर्माण झाले.
मौर्यांचे एकछत्री साम्राज्य विशेषतः संपूर्ण उत्तर भारतावर प्रस्थापित झाले. मौर्यपूर्व काळात भारतात राजकीय अस्थैर्य, गोंधळ, सत्तास्पर्धा होती.
मौर्यपूर्व काळात मगधवर शिशुनाग वंश, नंद वंश यांनी राज्य केले होते. मगध येथे मौर्य घराण्याची सत्ता प्रस्थापित होऊन भारतात नवे राजकीय व सांस्कृतिक जीवनच सुरू झाले.
डॉ. व्ही. ए. स्मिथ म्हणतात.
"The advent of the Mauryan dynasty makes the passage from darkness to light.".
मौर्यांनी संपूर्ण देशात एक आदर्श अशी "मुलकी" व्यवस्था सुरू केली. कित्येक शतकांनंतर व राजवंशांच्या उदयास्तानंतरही मौर्यानी निर्माण केलेली शासन व्यवस्थाच कायम होती.
मौर्य कालखंडात व्यापार, उद्योगधंदे, वाङ्मय, कला आदींची प्रगती झाली.
डॉ. आंबेडकरांनी "मौर्य कालखंड स्वातंत्र्य, श्रेष्ठत्व व वैभव यांचा विचार करता भारताच्या इतिहासातील एकमेव कालखंड होय असे म्हटले आहे."
चंद्रगुप्त मौर्य :
पूर्वचरित्र:
कुलाविषयी भिन्न मते :
चंद्रगुप्तमौर्य हा मौर्यसाम्राज्याचा संस्थापक होय.
चंद्रगुप्त मौर्य हा कोण होता, मौर्य कुळ क्षत्रिय होते की शूद्र होते, मौर्य व नंदांचा संबंध काय इ. प्रश्नांची उत्तरे तत्कालीन ग्रंथांत भिन्न भिन्न आहेत.
जैन व बौद्ध साहित्यानुसार तो क्षत्रिय होता तर ब्राह्मण ग्रंथानुसार तो शूद्र होता. चंद्रगुप्त हा शूद्र कुळातील होता हे खालील ग्रंथांत दाखवले आहे.
१) हिंदू – विष्णू पुराणात व तत्कालीन समजुतीप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य हा नंदवंशातील शेवटच्या सम्राटाच्या (धनानंद) मुरा नांमक दासीचा पुत्र होय. म्हणून मुरा या शब्दावरून मौर्य हा शब्द बनला. पण मुरावरून मौर्य ही उत्पत्ती पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे अयोग्य आहे.
विशाखादत्त याने लिहिलेल्या 'मुद्राराक्षस' या नाटकात चंद्रगुप्त हा एक दासीपुत्र होता. धनानंद या शेवटच्या नंद राजाच्या 'मुरा' नावाच्या दासीपासून झालेला होता. 'मुरा' या आईच्या नावावरूनच चंद्रगुप्ताच्या घराण्याला मौर्य हे नाव पडले व चंद्रगुप्तानेच चाणक्य या धनानंदाकडून अपमानित झालेल्या राजनीतिज्ञाच्या मदतीने मौर्य वंशाची स्थापना केली असे कथानक आहे. तत्कालीन ग्रंथ म्हणून हा पुरावा महत्त्वाचा ठरतो.
२) जैन - जैन परंपरेप्रमाणे चंद्रगुप्त हा एक ग्रामप्रमुखाच्या मुलीचा मुलगा होय. या गावात मोर पाळणारे लोक राहात होते. त्यामुळे 'मयूरपोषक' या शब्दावरून मौर्य हा शब्द बनला असावा.
एका स्मारकावरून असे स्पष्ट दिसते की, मौर्यवंशाची संबंध मयुरांशी अवश्य असावा.
सांची येथील मूर्तिमध्ये व नंदरगड येथील अशोकाच्या स्तंभात मोरांची चित्रे आढळली आहेत. तसेच पाटलीपुत्र येथील बागेत पाळीव मोर ठेवण्यात आले होते.
३) बौद्ध - महावंशानुसार चंद्रगुप्त खट्टीय गोत्राचा वंशज असून मौर्य नावाने प्रसिद्ध होता.
दिव्यावदानानुसारही चंद्रगुप्ताचा पुत्र बिंदुसार क्षत्रिय होता. असे आहे. महापरिनिभाणसुत्त या ग्रंथांत चंद्रगुप्त क्षत्रिय होता हे सिद्ध केले आहे.
त्यात म्हटले आहे की. चंद्रगुप्ताचे वंशज क्षत्रिय असून इ.स.पू. सहाव्या शतकात ते नेपाळ तराईमध्ये पिप्पलीवन नामक प्रदेशाचे सत्ताधीश होते. नंतर हा प्रदेश मगध साम्राज्यात विलीन करण्यात आल्यामुळे मौर्यवंशाची वाताहात झाली असावी.
'दिव्यावदान' व 'महावंश' या बौद्ध ग्रंथांत चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे म्हटले आहे.
४) ग्रीक: ग्रीक ग्रंथात चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे म्हटले आहे.
५) सोमदेवकृत 'कथासरित्सागर' मध्ये चुद्रगुप्त नंदाचा पुत्र होता. तो दासीपुत्र किंवा शूद्र मातेपासून उत्पन्न झाला नव्हता. मगधच्या राजसत्तेचा तो वंशपरंपरेने अधिकारीच होता असे म्हटले आहे.
वरील नोंदी व इतिहासकारांनी काढलेले निष्कर्ष यांच्या आधारे चंद्रगुप्त हा क्षत्रिय कुळातील होता हे मान्य झाले आहे.
चंद्रगुप्ताच्या प्रारंभिक जीवनाबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ‘मोरीय’ टोळीत चंद्रगुप्ताचा जन्म झाला असे बौद्ध परंपरा मानते. या टोळीप्रमुखाचा तो पुत्र होता.
टोळीयुद्धात त्याचे वडील वारल्याने त्याच्या आईने छोट्या चंद्रगुप्तसह पाटलीपुत्र येथे आश्रय घेतला.
चंद्रगुप्त हा अत्यंत हुशार व राजलक्षणी होता. तो स्वत:च्या अंगच्या गुणांमुळे नंदांच्या लष्करात एका साध्या शिपायापासून ते सेनापतीपदापर्यंत पोहोचला.
धनानंद हा नंद राजा अतिशय जुलमी व संपत्तीचा लोभी होता. त्याने प्रजेवर प्रचंड कर लादले होते. जनतेचा तो छळ करी. जनतेला त्याची सत्ता नको होती.
चंद्रगुप्ताने धनानंदाच्या सत्तेचा शेवट करण्याचे ठरवले; परंतु नंदाची सत्ता उलथवून टाकण्याचा त्याचा कट अयशस्वी ठरला. त्यानंतर तो पंजाबात पळून गेला. त्यानंतर तो कदाचित अलेक्झांडरच्या लष्करात भरती झाला असावा किंवा ग्रीकांच्या युद्धपद्धतीचा त्याने अभ्यास केला असावा.





