Monday, 30 October 2023

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ४

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ४
पुरातत्वशास्त्रीय आधार
भूमिगर्भात काय दडले आहे हे शोधून त्याचा अभ्यास करणे तथा त्यानुसार भूतलावर पूर्वी काय घडून गेले हे आपल्याला पुरातत्वशास्त्र सांगू शकते. ही विद्या जगन्मान्य असून पुराव्याशिवाय काहीही स्वीकारणे हे पुरातत्वशास्त्रात नियमबाह्य मानले जाते आणि त्यामुळेच हे शास्त्र जे काही तर्क वर्तवते त्याचे खंडन करणे क्लिष्ट असते. भारतात आंग्लाईत अलेक्झांडर कनिंगहमने या शास्त्राचा पाया रोवला होता.
AIT/AMT च्या मते ख्रिस्तपूर्व ३००० पर्यंत सगळे इंडो-इराणीयन मूळस्थानात एकत्रित होते आणि नंतर विस्थापित झाले. बुद्धकाळापासून तरी भारतात इंडो-आर्यन भाषा असल्याचे उल्लेख आहेतच, तेव्हा या भाषा पूर्व भारतापर्यंत पसरल्या म्हणजे निश्चितच वैदिक काळ बुद्धाच्या पूर्वीचा आहे हे सत्य मानावे. हा वैदिक काळ बराच मोठा असून ऋग्वेद हा त्यांचा सर्वात प्राचीन आणि अथर्ववेद सर्वात अर्वाचीन ग्रंथ आहे. वेगवेगळ्या वैदिक वाङ्मयांच्या रचनेत जरी अंदाजे २०० वर्ष अंतर धरले तरीही ख्रिस्तपूर्व १२०० च्या आधीच्या काळात ऋग्वेद लिहून पूर्णत्वास गेल्याचा मॅक्समूलर अंदाज लावतो. म्हणजे १५०० ख्रिस्तपूर्वमध्ये ऋग्वेद निर्मितिस प्रारंभ झाला असेल कारण ऋग्वेद हा अनेक पिढ्यांनी मिळून रचलेला (पारंपरिक मतानुसार दिसला) आहे. १२०० ख्रिस्तपूर्वमध्ये भारतात लोहयुग चालू होते असे सर्वमान्य आहे पण वेद त्याहीपूर्वीचे आहेत. कोणतेही युग एका वर्षात संपत नाही, तेव्हा निश्चितच ऋग्वेद त्याच्या कैक वर्षं मागे जाणार.
AIT/AMT अनुसार आर्य भारतात ख्रिस्तपूर्व १५०० च्या काळात आले आणि लगेच त्यांनी ऋग्वेद रचायला सुरुवात केली. त्यांनी ३००० वर्षांपूर्वी आपले मूळस्थान दक्षिण रशिया सोडले आणि या दोन घटनांच्या मधील १५०० वर्षात या इंडो-इराणीयन लोकांनी दक्षिण रशिया सोडला, मध्य आशियात आले, विविध ठिकाणी स्थायिक झाले, मध्य आशियात येऊन इंडो-इराणीयन संस्कृतीचा पाया घातला आणि नंतर दुभागून प्रथम समूह भारतात आणि दुसरा इराणमध्ये गेला. केवळ १५०० वर्षंच्या कालावधीत एवढा सांस्कृतिक बदल होणे पुरातत्वशास्त्रानुसार संभवनीय नाही.
पुरातत्व संशोधनावरून भारतात प्रोटो-इंडो-युरोपियन, इंडो-आर्यनचे पुरावे नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. भारतात प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष आहेत ज्याचा संबंध AIT/AMT कोणत्याही आधाराशिवाय द्राविडी लोकांशी जोडते. वास्तविक सिंधू संस्कृतीत यज्ञकुंड सापडले आहेत ज्यांस आज AIT/AMT स्वयंपाकाची भांडी मानते.
पुरातत्वशास्त्र एखाद्या ठिकाणी कोणती भाषा अस्तित्वात होती हे सांगू शकत नाही पण ढोबळमानाने अनुमान लावते जसे दक्षिण भारतात पुरावे सापडले तर ते पुरावे द्राविडी भाषकांचे असतील म्हणून. पण स्थलांतरण, वांशिक, सांस्कृतिक परिवर्तन, नवीन लोकांचे झालेले आगमन इत्यादि गोष्टी पुरातत्वशास्त्र सांगू शकते.
पुरातत्वशास्त्राच्या मते साधारणपणे २००० ख्रिस्तपूर्व काळामध्ये सरस्वतीचा लोप होण्यास आरंभ झाला. हिमालयातील परिवर्तनामुळे सरस्वतीला स्रोत म्हणून मिळणारा जलौघ बंद पडला आणि त्यामुळे हळूहळू सरस्वती मधील गाळ आणि थर वाळवंटातील वाळू यांच्या प्रभावामुळे सरस्वती हळूहळू लोप झाला. सरस्वतीच्या उपनद्या असलेल्या यमुना आणि सतलज या नद्यांनी देखील या काळात आपले पात्र वळविले ज्यामुळे सरस्वतीला उपनद्यांकडून मिळणारे पाणी बंद झाले. अर्थात् वैदिक संस्कृती ही सरस्वतीच्या काठी बहरली आणि त्यामुळेच तिचा रचना काळ निश्चितच ख्रिस्तपूर्व २००० च्या मागे जातो.
पाश्चिमात्य लोकांच्या मते ख्रिस्तपूर्व १५०० मध्ये सिंधू संस्कृतीचा लोप झाला, आणि ख्रिस्तपूर्व ११०० नंतरचा इतिहास आज उपलब्ध आहे. या दोन्ही काळांच्या मधील ४०० वर्षाच्या काळामध्ये त्यांना ऐतिहासिक पोकळी भरून काढायला कुठलेही साधन न मिळाल्यामुळे त्यांनी या ४०० वर्षात तथाकथित आर्य लोक बाहेरून भारतात आले आणि त्यांनी नष्टप्राय झालेल्या नागरी संस्कृतीस पुनरुज्जीवित केले असे प्रतिपादन केले. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे सांगितले की सिंधू संस्कृतीचा नाश याच आर्य लोकांनी केलेला आहे. या मताला छेद देताना पुरातत्वशास्त्र असे सांगते की सिंधू संस्कृतीचा नाश हा नैसर्गिक कारणांनी झालेला असून तिथे कुठलेही शस्त्र किंवा युद्धाच्या खुणा सापडल्या नसल्यामुळे कोणत्याही आक्रमकांनी त्याचा विनाश केलेला नाही. कुठल्याही संस्कृतीचा नाश कशामुळे झाला हे पुरातत्वशास्त्र काही निकषांच्या आधारावर सहज सांगू शकते.
या मतावरून कुठलेही युद्ध न झाल्याचे मत प्रस्थापित झाल्यानंतर आर्य आक्रमण सिद्धांतवादी लोकांनी जुने मत (AIT) रहित करून त्या जागी आर्य विस्थापन सिद्धांत (AMT) पुढे आणला. या मताच्या म्हणण्यानुसार जर मध्य आशियातील लोकांनी वैदिक संस्कृती भारताला दिली होती तर आज मध्य आशियात एकही वैदिक संस्कृतीची खूण का शिल्लक राहिलेली नाही? या विरुद्ध भारतीय तथाकथित द्रविड लोकांनी मात्र स्वतःची मूळ संस्कृती सोडून परकीय वैदिक संस्कृती कशी स्वीकारली? या पुरातत्वशास्त्राच्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र AIT/AMT मताची दातखिळी बसते.
पुरातत्त्वशास्त्र सांगते की सिंधू संस्कृतीच्या उत्खननात घोड्यांचे अवशेष सापडत नाहीत तसेच भारतीय उपखंडातील घोड्यांची मूळ प्रजाती फार पूर्वी लुप्त झाली असून ख्रिस्तपूर्व १५०० ते २००० या काळापासून पुनरपि घोड्यांचा संचार भारतीय उपखंडात आढळतो. पण हे आधुनिक घोडे मात्र भारतीय नसून मध्य आणि पश्चिम आशियातून आयात केलेले जाणवतात. याचे भांडवल करून AIT/AMT युक्तिवाद करते की याच काळात मध्य आशियातून तथाकथित आर्य भारतात आले जे अश्वविद्येत निपुण होते. वैदिक जन आणि घोड्यांचा संबंध अतुट आहे यात दुमत नसले तरीही वैदिक लोकसुद्धा पश्चिमेकडून या अश्वांची आयात करू शकत होते याबाबत AIT/AMT विचार करत नाही. प्राचीनकाळी अगदी सिंधू संस्कृतीच्या काळातही पश्चिम आशियाशी तत्कालीन भारताचे व्यापारी संबंध असल्याचे आज पुरातत्त्वशास्त्र मान्य करते. तस्मात वैदिक लोक जे अश्वविद्येत पारंगत होते ते भारताच्या बाहेरून घोड्यांची आयात करून त्यांचा यथायोग्य सदुपयोग करत असल्यास आश्चर्य नाही. अश्वविद्या येण्यासाठी म्हणून वैदिक लोकांना मध्य आशियात जाण्याचे प्रयोजन नव्हते.
पाश्चिमात्य पुरातत्वज्ञ के. ए. आर. केनेडी म्हणतात की "ख्रिस्तपूर्व ५००० ते ख्रिस्तपूर्व १००० या काळात असे बदल झालेले उत्तर भारत ते अफगाणिस्तान या विस्तीर्ण प्रदेशात दिसत नाहीत. त्यामुळे याकाळात आर्यच काय तर कोणतेही विदेशी लोक स्थायिक व्हायला आले नाहीत. आले असतील तर यापूर्वी किंवा नंतर. पण आर्य ३००० ख्रिस्तपूर्वच्या सुमारास मूळस्थानात होते आणि किमान १२०० ख्रिस्तपूर्व वेद रचून झाले होते जे आर्यांचे ग्रंथ होते. यावरून आर्य आगमन हे एक मिथक आहे हे सिद्ध होते."
जे. जी. शेफर म्हणतात की "सांस्कृतिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या इंडो-आर्यन लोकांचे दक्षिण आशियात पसरण्याचे किंवा स्थलांतरण करण्याचे पुरातत्त्व अभिलेखाने वर्णन केलेले नाही."
AIT/AMT चे प्रचारक आणि खंदे पुरस्कर्ते मायकल विट्झेलही मान्य करतात की "अजूनपर्यंत यावर स्पष्ट (विश्वसनीय) पुरातत्वीय पुरावे सापडलेले नाहीत."
म्हणजेच पुरातत्वशास्त्रपण आर्य बाहेरून येण्याचे पुरावे देण्याऐवजी पुराव्यांच्या आधारे आर्य भारतीय असण्यावरच भर देते.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...