Monday, 30 October 2023

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ५

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ५
ऋग्वेदात स्वतःस आर्य म्हणविणारे भरतवंशी पुरु लोक त्यांच्या शत्रूंना मृध्वाच् म्हणत जसे आजच्या इराणमध्ये त्याकाळी असलेले लोक स्वतःस आरिय आणि शत्रूंस तुरिय म्हणत तसेच. देववात, सृंजय, दिवोदास (सृंजयपुत्र), सुदास्, सहदेव, सोमक (सहदेवपुत्र) इत्यादि ऋग्वेदात येणारे भरत पुरु राजे स्वतःस आर्य म्हणवत आणि विरोधकांना दस्यु. ऋग्वेदात आंगिरस, वासिष्ठ, वैश्वामित्र या भरत पुरुंशी संबंधित ऋषीकुळांनी आणि स्वतः भरत लोकांनी मिळून एकूण ३१ वेळा आर्य शब्द स्वतःसाठी (भरत पुरुंसाठी) वापरला आहे. ३ वेळा काण्व लोकांनीही आर्य शब्द वापरला आहे आणि तोही एकट्या भरत राजा दिवोदासासाठी.
ऋग्वेदाच्या १० मंडलांची आधुनिक अभ्यासक लोकांनी जुनी आणि नवीन अशी विभागणी केली आहे ज्यात २, ३, ४, ६, ७ इत्यादि जुनी मंडले आहेत आणि यांमध्ये भरत पुरु हे नायक आहेत. ऋग्वेदाचा बराच भाग भरत पुरुंच्याच अनुषंगाने दिसतो. ऋग्वेदातील १०२८ ऋचांपैकी १९ ऋचा स्वतः भरत लोकांनीच रचल्या आहेत. ऋग्वेद रचणाऱ्या १० कुळांपैकी १ कुळ भरत पुरु होते.
ऋग्वेदात मंत्रास ऋचा तर त्याच्या द्रष्ट्यास ऋषि ही संज्ञा आहे. ऋषिर्दर्शनात् म्हणजेच जो वेदमंत्र पाहतो तो ऋषि. या न्यायाने काही स्त्रियाही ऋषिसंज्ञेला प्राप्त आहेत. बऱ्याच सुक्तांचे ऋषि ज्ञात नसल्याने त्यांचे कर्तृपद त्या सूक्तातील देवतेला दिले आहे किंबहुना बरेचदा स्वतः ऋषींनीच तसे केलेले आहे. बहुतेक ऋषि गृहस्थ होते, ऋषि हे काही आश्रम नव्हे. ऋग्वेदात आंगिरस, भार्गव, वासिष्ठ, कौशिक, आत्रेय, काश्यप इत्यादि ऋषींची मुख्य कुळे आपल्याला दिसतात. वेदांमध्ये ब्राह्मण तसेच क्षत्रिय ऋषींची नावेही आहेत ज्यांना राजर्षी म्हटलेले आहे.
ऋग्वेदात ऋषीकुळांप्रमाणेच नानाविध क्षत्रिय जमातींची नावेही येतात. या जमातींमध्ये तृक्षि (इक्ष्वाकु) सारख्या सूर्यवंशी तर यदु, तुर्वसु, दृह्यू, अनु, पुरु इत्यादि चंद्रवंशी म्हणविणाऱ्या जमातींचा अंतर्भाव होता. या क्षत्रिय जमातींनी तत्कालीन उत्तर भारतातील वेगवेगळे प्रदेश व्यापलेले होते. या सर्व जमातींची मूळ स्थानं अशी दिसतात
१) इक्ष्वाकू- उत्तरप्रदेश, बिहार
२) यदु- गुजरात, राजस्थान, माळवा
३) तुर्वसु- पूर्व भारत
४) दृह्यू- पंजाब
५) अनु- काश्मीर
६) पुरु- हरियाणा, पश्चिम उत्तरप्रदेश (पश्चिमेकडून पूर्वेकडे वळत गेले.)
पुराणांमध्येही या जमातींचे उल्लेख आहेत परंतु तिथे यांसाठी जमातींऐवजी वंश शब्द योजला आहे. या जमातींपैकी यदु, तुर्वसुंचा उल्लेख सोबत येतो आणि ते वैदिक नाहीत असे निदर्शनास येते, त्यांचे बरेचदा एकमेकांना समर्थन तर कधी विरोधही असे. तुर्वसु लोकांचा तीनदा तर अनु लोकांचा चारपैकी दोनदा उल्लेख हा वैदिक पुरुंच्या शत्रूगटात आहे.
अनु लोकांमध्ये पार्शव (पर्शियन), पार्थव (पार्थियन), पक्थ (पख्तुन), भलण (संभवत: बलोच) असे लोक होते. उत्तर काळात भृगु/भार्गव ऋषीकुळाचे लोक हे पार्शव नामक अनु जमातीच्या लोकांचे (इराणी लोक) पुरोहित होते ज्यांपैकी जमदग्नी भार्गव हे एक घराणे वैदिक लोकांच्या पक्षात आलेले दिसते ज्यामुळे त्यांना ऋग्वेदात महत्व प्राप्त झाले.
आता वळूया ऋग्वेदातील युद्धांकडे. पुरु आणि त्यांचे शत्रू यांच्यात झालेल्या तीन युद्धांचे वर्णन आपल्याला ऋग्वेदात मिळते
१) प्रथम युद्ध भरत राजा सृंजयच्या काळी हरियाणात हरियुपिया नदीच्या काठी झाले होते.
२) द्वितीय युद्ध भरत राजा सुदास् याच्या काळी भारत पाकिस्तान सीमेजवळ परुष्णी (सांप्रत रावी नदी) नदीच्या तटावर झालेले दाशराज्ञ युद्ध.
३) तृतीय युद्ध अफगाणिस्तानात सहदेव, सोमकाच्या काळी झाले ज्यास वार्षागीर युद्ध म्हणतात.
भौगोलिक स्थानांच्या निरीक्षणोपरांत लक्षात येते की या युद्धांचा क्रम पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. प्रत्येक युद्धानंतर अनु लोक पुरुंकडून पश्चिमेला ढकलले जात होते. आर्मेनियन, अल्बानियन, इराणीयन, ग्रीक ही इंडो-युरोपियन भाषाकुळं भारतातून सर्वात शेवटी बाहेर गेली होती जी याच अनु जमातींची असावीत.
आता उपरोल्लेखित तिन्ही युद्धांचा आढावा घेऊ
१) हरियूपीयाचे युद्ध
ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात ६.२७ या सुक्तात आपल्याला या युद्धाचा वृत्तांत दिसतो. हे युद्ध यव्यावती आणि हरियूपीया (सांप्रत हरियाणातील घग्गर नदी) या सरस्वतीच्या उपनद्यांच्या काठी झाले होते. या संग्रामात भरत पुरु राजा सृंजय याने अनु लोकांच्या अभ्यावर्तीन् चायमान नामक राजाच्या सहाय्याने पंजाबात शिरलेल्या यदु आणि तुर्वसु लोकांवर विजय मिळविला होता.
२) दाशराज्ञ युद्ध
ऋग्वेदाच्या सातव्या आणि तिसऱ्या मंडलांत भरत राजा सुदास् याचा युद्ध करताना उल्लेख आहे. राजा सुदास् याचे मंडलांमध्ये अनुक्रमे वासिष्ठ आणि वैश्वामित्र कुळांतील ऋषि राजपुरोहित होते. तिसऱ्या मंडलात ३.३३ या सुक्तात राजा सुदास् याला यज्ञासाठी आवश्यक असणाऱ्या सोम वनस्पतीच्या प्राप्तीसाठी तिचे उत्पादन होणाऱ्या वायव्य भारतास आपल्या राज्यात जोडण्याच्या हेतूने शुतुद्री (सांप्रत सतलज नदी) आणि विपाशा (सांप्रत बियास नदी) नद्यांपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार करतो. याच मंडलात ३.५३ व्या सुक्तात सुदास् साठी विश्वामित्र अश्वमेध यज्ञ करतात पण तदुपरांत विजयाचा मात्र उल्लेख येत नाही. सातव्या मंडलात वसिष्ठ १८, ३३, ८३ या ऋचांमध्ये सुदास् राजाच्या युद्धाचे आणि ५, ६ या ऋचांमध्ये युद्धानंतरचे वर्णन करतात. हे युद्ध पूर्वेस यमुनातीरावरचे असून दाशराज्ञ युद्धापूर्वीचे आहे.
या यमुना तीरावरील युद्धातील नावं संस्कृत तर परुष्णी (सांप्रत रावी नदी) तटावर झालेल्या दाशराज्ञ युद्धातील नावं इराणी, ग्रीक, आर्मेनियन, आल्बेनियन नावांसदृश आहेत. यमुना तीरावरील युद्धातील शत्रूंची नावं भेद, अज, देवक, श्रीघु, यक्षु, मन्यमान, तुर्वसु, मत्स्य, पुरु (भरतेतर पुरु) अशी संस्कृत आहेत तर दाशराज्ञ युद्धातील शत्रूंची नावं (ऋचा क्रमांक आणि नाव) खालीलप्रमाणे
१) ७.८३.१ - परशु/पार्शव, पृथु/पार्थव, दास
२) ७.१८.५ - शिम्यु
३) ७.१८.६ - भृगु, द्रुह्यू
४) ७.१८.७ - अलिन, भलण, पक्थ, शिव, विषाणीन
५) ७.१८.८ - कवी चायमान (अनु राजा)
६) ७.१८.११ - वैकरण
७) ७.१८.१२ - द्रुह्यू, कवष (अनुंचा पुरोहित)
-> हीच नावं मज्दयस्नी/झरथुष्ट्री लोकांच्या अवेस्तात (स्थलपरत्वे) पुढीलप्रमाणे आहेत (कंसात ऋग्वेदातील नावं आहेत)
१) अफगाणिस्तान - सयरीमा (शिम्यु), दही (दास), वैकरत (वैकरण)
२) ईशान्य अफगाणिस्तान - नूरीस्तानी/पिशाचिन (विषाणीन)
३) पख्तुनिस्तान - पख्तुन/पश्तु (पक्थ)
४) बलुचिस्तान - बलुची/बोलन (भलण)
५) ईशान्य इराण - पार्थियन/पार्थव (पृथु/पार्थव)
६) नैऋत्य इराण - पर्शियन/परसुआ (परशु/पार्शव)
७) उझबेकिस्तान - ख्वारेमियन/खिवा (शिव)
८) पश्चिम तुर्कमेनीस्तान - दहाए (दास)
९) युक्रेन, दक्षिण रशिया - अलन (अलिन), सर्मेशियन (शिम्यु)
१०) कौसा (कवष)
११) कौई (कवी)
-> आर्मेनियन भाषाकुळातील थ्रॅको/फ्रिगियन जमाती
१) टर्की - फ्रिगियन/फ्रिगे (भृगु)
२) रोमानिया, बल्गेरिया - डाकीयन (दास)
-> ग्रीक भाषाकुळात
१) हेलेना (अलिन)
-> अल्बानियन/इलीरियन भाषाकुळातील जमाती
१) सिर्म्युम/सिर्मियो (शिम्यु).
उपरोक्त समस्त जमाती दाशराज्ञ युद्धापूर्वी पंजाब प्रदेशात होत्या ज्या भरत पुरुंशी झालेल्या संघर्षानंतर विस्थापित झाल्या. या जमातींच्या वेगवेगळ्या भाषांमधील नावांचे साम्य आणि भाषिक संबंध बघता ही भाषाकुळं आणि जमाती मूळच्या भारतीय असून पराजय झाल्यावर पश्चिमेला गेल्या असणे संभवनीय आहे.
३) वार्षागीर युद्ध
या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धाचा वृत्तांत पहिल्या आणि चौथा मंडलात अंतर्भूत आहे. १.१००, ४.१५ या सुक्तांत आणि ४.३०.१८ या ऋचेत सहदेव आणि सोमक या भरत राजांचा उल्लेख आहे. वार्षागीरवंशीय पुरु पितापुत्रांनी गाजवलेल्या या समराचे वर्णन अवेस्तातही आहे. या युद्धातील शिम्यु लोकांचे ७.१८.५, १.१००.१८ या ऋचांमधील उल्लेख वार्षागीर युद्धास दाशराज्ञ युद्धाशी जोडतात. याव्यतिरिक्त शिम्यु लोकांचे इथे उल्लेख नाहीत. या युद्धात शत्रूंची नावं स्पष्ट केलेली नाहीत.
युद्धभूमीवर अरण आणि चित्ररथ हे आर्य सरयु नदीच्या (सांप्रत अफगाणिस्तानातील हरि नदी) पलीकडे मारल्याचे उल्लेख ४.३०.१८ क्रमांकाच्या ऋचेत आहेत. हे उभय आर्य भरत पुरु होते जे शत्रू पक्षात सहभागी झाले होते. या युद्धातील जेत्यांची नावं १.१००.१७ या ऋचेत ऋज्राश्व, भयमान, सुराधस्, अंबरिष, सहदेव अशी दिली आहेत. अवेस्तात या युद्धासंदर्भात म्हटले आहे की मनुश्चित्र (आजचे पारशी लोकांचे मिहोचेर नाव याचाच अपभ्रंश आहे) नामक इंडो-आर्यन त्यांच्या (पराभूत शत्रूंच्या) बाजूने लढला. पहलवी ग्रंथात यष्त १९.१ मध्ये म्हणतात की त्याचा जन्म मनुशाजवळ (हरियाणातील एक तलाव) झाला. फरवर्दीन यष्त १३१ अनुसार मनुश्चित्र हा अरियुचा पुत्र होता. ही मनुश्चित्र आणि अरियु नावं अनुक्रमे चित्ररथ आणि अरण असणार. अवेस्तात ऋज्राश्व हा तुराणी नेता असून त्याचे नाव अर्जतस्प किंवा अर्जस्पा म्हटले आहे. शाहनामेत (४६२ वा अध्याय) सहदेव हा ऋज्राश्वाचा सहकारी असून त्याचे नाव हुष्दीव म्हटले आहे. सुराधस् हे बहुधा सुदास् राजाच्या वंशजांसाठी वापरले असावे कारण राधस् म्हणजे संपत्ती आणि सुराधस् म्हणजे दान केलेली उत्तम संपत्ती ज्याचा अर्थ सुदास् असाच आहे. या संग्रामावेळी सुदास् जिवंत नव्हता तेव्हा हा त्याचा वंशज सोमक असावा ज्याचा अवेस्तात (शयरियारजींच्या मते) हुमायक असा नामोल्लेख आहे. भयमान आणि अंबरिष ही नावं अवेस्तात प्रत्यक्षपणे नाहीत. अंबरिष इक्ष्वाकू होता पण शयरियारजी म्हणतात की अवेस्तात ऋजाश्वासोबत विदर्फश्निक आणि वंदरमैनी अशी नावं त्याचे भाऊ आणि पिता म्हणून आहेत ज्यापैकी विदर्फश्निक आणि अंबरिषचा अर्थ उत्तम वस्त्र परिधान केलेला तर वंदरमैनी आणि भयमानचा अर्थ निर्भय असून या नावांमधील अर्थसाधर्म्य या व्यक्ती एक आहेत हे दर्शवते.
पार्थवांचे पश्चिमेस गमन
जुन्या मंडलांतील सहाव्या मंडलात पार्थव अनु राजा अभ्यावर्तीन् चायमान हा हरियाणात होता. पुढे नंतरच्या सातव्या मंडलात त्याचाच वंशज कवी चायमान हा दाशराज्ञ युद्धात सहभागी असून तो त्यावेळी पंजाबमध्ये होता. झरथुष्ट्र काळी अफगाणिस्तान वगैरे भागात कवी चायमानाच्या वंशातील म्हणजेच कवीयान राजा विष्तास्प शासन करत होता. जरी अवेस्ता हे विधान करत नसले तरीही याला नंतर पार्थियन साहित्य अवेस्तातील कवीयान राजवंश पार्थव होता असे सांगत दुजोरा देते. या तिन्ही राजांचा कार्यकाळ कालक्रमानुसार लावत भौगोलिक स्थिती बघितली असता असे निदर्शनास येत की पार्थव अनु लोकांचा प्रवास हरियाणा -> पंजाब -> अफगाणिस्तान असा पश्चिमगामी आहे.
ही तिन्ही युद्ध आणि त्यांच्या परिणामांवरून तसेच काही इतर बाबींच्या अभ्यासांती काही निष्कर्ष काढता येतील ते खालीलप्रमाणे
१] युद्धांचे महत्व
ऋग्वेद आणि पुराणं अगणित युद्धांनी भरलेली आहेत जे बहुतांश स्थानिक पातळीवर होते. कालौघात यांचे सामरिक महत्व नष्ट होऊन त्यांना आध्यात्मिक महत्व मात्र तेवढे उरले. दाशराज्ञ आणि वार्षागीर युद्ध हे सिद्ध करते की अनु इत्यादि लोक भारतातून पश्चिमेला गेले आहेत.
२] स्थलांतरांचा काळ आणि क्रम
सर्व इंडो-युरोपियन संस्कृतींमध्ये चाकांसाठी शब्द असल्याने निश्चितच ते चाकाच्या शोधापर्यंत एकत्र असणार (ख्रिस्तपूर्व ३०००-४०००). तसेच सरस्वती नदी ख्रिस्तपूर्व १९०० च्या सुमारास लोप पावली त्यामुळे ऋग्वेद तितका मागे जातो. शिवाय सर्व इंडो-युरोपियन संस्कृती भारतीय असल्या तरीही वैदिक किंवा इंडो-आर्यन नव्हत्या. फक्त मिटानी, जिप्सी हे इंडो-आर्यन होते जे पूर्वीच पश्चिमेला स्थलांतरित होऊन गेले.
हिटाईट आणि टोखारीयन ही भारतातून बहिर्गमन करणारी पहिली २ भाषाकुळं होती जी मध्य आशियात गेली. टोखारीयन मध्य आशियात राहिले पण हिटाईट मात्र ईशान्येकडून टर्कीत गेले जे त्यांच्या मंगोल लोकांशी असलेल्या संबंधांवरून कळते. नंतर स्लाव्हिक, जर्मेनिक, इटालियन, केल्टिक, बाल्टिक लोक भारतातून पश्चिमेला गेले. आणि अखेरीस इराणीयन, ग्रीक, अल्बानियन, आर्मेनियन हे बाहेर पडले ज्यांची नावं दाशराज्ञ युद्धात आहेत. भारतात सरतेशेवटी फक्त इंडो-आर्यन भाषक उरले.
३] पहिले आणि तिसरे स्थलांतरण
भारतातून बाहेर एकूण जायचे ३ प्रवाह होते.
१) पहिले म्हणजे हिटाईट आणि टोखारीयन जे मध्य आशियात गेले ज्यांना पुढे पुराणांमध्ये उत्तर मद्र आणि उत्तर कुरु म्हटले असावे.
२) तिसरे आणि सर्वात मोठे स्थलांतरण म्हणजे भरत पुरुंकडून पराभूत अनु लोकांचे म्हणजेच इराणीयन, ग्रीक, अल्बानियन, आर्मेनियन लोकांचे.
४] दुसरे स्थलांतरण
दुसरे स्थलांतरण होते द्रुह्यू म्हणजेच स्लाव्हिक, जर्मेनिक, इटालियन, केल्टिक, बाल्टिक लोकांचे जे ऋग्वेदपूर्व काळी झाले. यांचे उल्लेख वायुपुराण (९९.११.१२), ब्रह्मांडपुराण (३.७४.११.१२), मत्स्यपुराण (४८.९), विष्णुपुराण (४.१७.५), भागवतपुराण (९.२३ १५.१६) इत्यादित येते. हे लोक आधी उत्तरेस आणि मग तिथून वायव्येस युरोपात गेले. उर्वरित द्रुह्यू दाशराज्ञ युद्धात दिसतात ज्यांना ऋग्वेद आणि अवेस्तात शत्रू म्हटले आहे. पुरु, द्रुह्यू, अनु यांचे पुरोहित अनुक्रमे आंगिरस, दृईड, भृगु/अथर्वण (आजही मज्दयस्नी/झरथुष्ट्री पुरोहितास अथर्वण म्हणतात) होते. झरथुष्ट्र हा भृगु/अथर्वण होता जो अरण्यात तप करत असताना त्याला अंगरा आणि द्रुज त्रास देतात. हा झरथुष्ट्र असुरमेधाचा (अहुरामज्दा) भक्त होता जो तक्षशिलेत शिकला आणि वयाच्या तिसाव्या वर्षी याला असुरमेधाचा साक्षात्कार झाल्यावर हा इराणमध्ये गेला होता. तेथे गेल्यावर तो पार्थव अनु राजा विस्ताष्पाचा पुरोहित झाला आणि पुढे त्यानेच मज्दयस्नी/झरथुष्ट्री धर्माची स्थापना केली.
५] जमाती आणि धार्मिक मान्यता
१) यज्ञ परंपरा पुरु, अनु, द्रुह्यू लोकांमध्ये समान होती पण उर्वरित भारतात त्यावेळी वैदिकेतर लोकही होते. आयर्लंडमध्ये मंदिरात अजूनही मज्दयस्नी/झरथुष्ट्री लोकांसारखे यज्ञ वगैरे ठेवतात ज्यास मज्दयस्नी/झरथुष्ट्री जस्न म्हणतात. हा शब्द संस्कृतमधील यत्न चा अपभ्रंश आहे. श्रौत परंपरा वेद, मज्दयस्नी/झरथुष्ट्रींमध्ये आहे.
२) यदु लोक निसर्गपूजक असावे. जसे पुराणांत यदु हे गोसेवक असत तसेच वासुदेव कृष्ण गोवर्धनपूजेचे महत्व पटवून देतात त्यावरून असे अनुमान बांधणे तर्कविसंगत ठरणार नाही.
३) उत्तर वैदिक काळातील बहुतांश उपनिषदं जनकादिक इक्ष्वाकू राजांच्या दरबारात स्फुरलेली आहेत. हे लोक तत्वज्ञानी, दार्शनिक होते. भविष्यात याच पूर्वेकडील भागात जैन, बौद्ध, आजीवक, चार्वाक अशी दर्शनं उदयास आली. म्हणजे पूर्व भारतात तत्वज्ञानाचा इतिहास जुना असावा.
४) दक्षिणेकडील शिल्पशास्त्र, मंदिरं तथा मूर्तीशास्त्राचा अद्वितीय उत्कर्ष लक्षात घेतला असता या प्रदेशात आजच्या हिंदूंचा गाभा असलेली मूर्तिपूजा कदाचित् या काळापसूनच रूढ असावी.
५) अति पूर्वेकडील आणि ईशान्य भारतात तंत्र, मंत्र इत्यादि विद्या पूर्वापार दिसतात ज्यांचे प्रस्थ या काळापासून असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व वैदिक, अवैदिक असलेल्या भारतीय संस्कृती जश्या एकमेकांच्या संपर्कात येत गेल्या तशी त्यांच्यात सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक देवाणघेवाण होऊन सरमिसळ झाली असावी ज्याचे फलश्रुति आजचा भारतीय हिंदू समाज आहे.
६] जमातींचे एकसूत्रीकरण
वेदांमध्ये यदु, तुर्वसु, द्रुह्यू, अनु, पुरु या वेगवेगळ्या जमाती असून त्यांच्यातील परस्पर सत्तासंघर्ष सिद्ध होत असला तरीही पुराणांत हे सर्व एकाच चंद्रवंशीय राजा ययाति याच्या संतती असल्याचे प्रतिपादन केलेले आढळते. यावर काही अभ्यासकांचे असे मत आहे की कदाचित् वेदांच्या रचनेच्या उत्तरकाळात या सर्व जमातींमधील आपापसातील वैमनस्य संपवून त्यांना एकसंध करायला त्यांची उत्पत्ती ही एकाच पूर्वपुरुषापासून झाली असावी असे कथात्मक दृष्टीने सांगितले असावे.
७] आर्य आणि एतद्देशीय स्थाननिश्चिती
भरत पुरुंच्या तिन्ही युद्धांवरून वेगवेगळ्या जमातींचे भारताबाहेर गमन सिद्ध होते.
सम्राट अशोकाचे ख्रिस्त तिसऱ्या शतकातील स्तंभलेख हे सांप्रत भारतभूवर उपलब्ध सर्वात जुने लेख आहेत. पश्चिम आशियात इराक, सीरियामध्ये भारतातून गेलेल्या मिटानी (ख्रिस्तपूर्व १४६०-१३३०) राजांनी राज्य केले. हे राज्य हुराईक भाषक लोकांचे होते जे इंडो-आर्यन भाषक नव्हते पण त्यांच्या राजांची नावं वैदिक होती. याच लोकांनी रथांचा उपयोग पाश्चात्य जगास परिचित करून दिला. यांच्या एका शिलालेखामध्ये वरुण, इंद्र, मरुत्, अश्विनीकुमार, इत्यादि वैदिक देवतांची नावं आहेत. तेव्हा भारतात ख्रिस्तपूर्व ३०० च्या आधीचे वैदिक उल्लेख नसले तरीही पश्चिम आशियात ख्रिस्तपूर्व १५०० चे मिटानी राजांचे उल्लेख आहेत. त्यांचे पूर्वज इंडो-आर्यन भाषक होते आणि पश्चिमेला गेल्यावर ते स्थानिक लोकांमध्ये मिसळले जे इंडो-युरोपियन नव्हते. भाषा बदलली तरीही मिटानी लोकांनी स्वतःची वैदिक नाव मात्र जपली होती. मिटानी लोकांमध्ये आकडे, नावं, अश्वविद्येशी निगडित गोष्टी, काही देवता वैदिक संस्कृतशी संबंधित दिसतात.
शिवाय मिटानी लोकांच्या पूर्वीचेही ख्रिस्तपूर्व १७०० मध्ये इराकच्या कॅसाईट नामक लोकांचे वैदिक नावांचे उल्लेख आहेत जे इंडो-आर्यन भाषक नव्हते हे सर्वमान्य आहे. सूर्य, मरुत्, भग अशी वैदिक नावं यांच्याकडे दिसतात तसेच अभिरथस नामक एका राजाचेही नाव दिसते जे वैदिक आहे.
कॅसाईट आणि मिटानी ही मंडली इंडो-आर्यन लोकांमधून विभक्त होऊन भारतातून स्थलांतरित झाली तेव्हा निश्चित ऋग्वेदाचा उत्तर काळ सुरू होता. ते पश्चिम आशियात स्थायिक होऊन त्यांना आपल्या इंडो-आर्यन भाषांचा विसर पडायला साधारणत: २००-३०० वर्षांचा कालावधी लागला असणार. या लोकांचे अस्तित्व अनुक्रमे ख्रिस्तपूर्व १७०० आणि १५०० मध्ये होते हे सिद्ध झाले आहे. म्हणजे ऋग्वेदोत्तर काळ ढोबळमानाने ख्रिस्तपूर्व २००० वर्षे मागे जातो. तसेच नवीन आणि जुन्या मंडलातील काळाचे अंतर लक्षात घेऊन आणि हा सांस्कृतिक बदल व्हायला लागलेला कालावधी धरून ऋग्वेदाच्या आरंभीच्या मंडलांचा काळ किमान ख्रिस्तपूर्व २५००-३००० तरी असणार.
तसेच वेदांचा काळ ठरवायचे मुख्य दोन घटक म्हणजे ख्रिस्तपूर्व १२०० च्या जवळपास भारतात लोहयुग सुरू झाले ज्याच्यापुर्वी ऋग्वेदाची निर्मिती पूर्ण झाली. ऋग्वेदात चाकांचे उल्लेख आहेत ज्यांचा शोध ख्रिस्तपूर्व ४००० च्या सुमारास लागला. म्हणजे ऋग्वेदाच्या रचनेचा काळ या दोन्हीच्या मधला, ख्रिस्तपूर्व १२००-४००० असा असावा.
हा जुना वैदिक किंवा इंडो-इराणीयन काळ अस्तित्वात असताना त्याच भागात विकसित अशी सिंधू संस्कृती नांदत होती पण वेदांमध्ये तिचा वेगळा स्वतंत्र उल्लेख नाही. यावरून असे म्हणणे असंयुक्तिक नाही की वैदिक संस्कृती हीच सिंधू-सरस्वती संस्कृती असणार.
____
श्री श्रीकांत तलगेरी यांची उपरोक्त सर्व विधानं आणि तर्क आर्यांच्या बाहेरून भारतात येण्याचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध करतात तसेच ऋग्वेदात नमूद असलेल्या प्राचीन भारतीय जमाती आणि त्यांच्या धार्मिक मान्यतांचा, संस्कृतींचा आजच्या सांस्कृतिक परिस्थितीवरील परिणाम कसा झाला यासंबंधी महत्वपूर्ण माहिती देतात.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...