आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ३
वाङ्मयीन आधार
ऋग्वेद हा आर्यांचा (इंडो-इराणीयन लोकांचा) ज्ञात आद्य ग्रंथ असल्याने त्यास या सर्वांचा ऊहापोह करताना महत्वाचे मानणे अनिवार्य आहे. म्हणून AIT/AMT समर्थक आर्य आगमनाचे ऋग्वेदानुसार ३ तर्क लावतात.
वास्तविक सर्व ऋग्वेदिय घटना या गंगा ते दक्षिण अफगाणिस्तान याच भागात घडल्या आहेत. तेव्हा AIT/AMT समर्थक लोकांचा अफगाणिस्तानापलीकडील उल्लेख असण्याचा तर्क खोटा ठरतो. AIT/AMT चे प्रचारक मायकेल विट्झेल म्हणतात की ऋग्वेदात रिप् शब्द आहे जो रशियातील रिपेयन पर्वताचा उल्लेख आहे पण या नावाचा एकही पर्वत नाही आणि असा शब्द ऋग्वेदातही नाही.
सरयु, सरस्वती या नावाच्या नद्या हरयु, हरहवती नावाने इराणीयन अवेस्तात येतात. तेव्हा हरयु, हरहवती याच खऱ्या नद्या असून त्यांची नावे पूर्वेकडील नद्यांना दिली असे त्यांचे म्हणणे आहे. पण या ग्रंथांमध्ये केवळ ही दोनच नावे समान आहेत. ऋग्वेदात येणारी सरयु ही अफगाणिस्तानातील आहे जिला आज हरि म्हणतात आणि अफगाणिस्तानी हरहवती या वैदिक भागाच्या बाहेरील आहे. तेव्हा हे पश्चिमेकडील नदीचे नाव देण्याचा संबंध येत नाही आणि भाषाशास्त्र हे अमान्य करू शकत नाही की सरस्वती वरून हरहवती नाव उदयास आले आहे. ज्या अर्थी भारतीय नावे अद्याप शुद्ध आहेत आणि ही सरयु, सरस्वती अनुक्रमे हरयु, हरहवती झाली त्या अर्थी या नद्यांचे मूळ भारतातच असणार आणि नावं मात्र पूर्वेकडून पश्चिमेला गेली आहेत. ऋग्वेदाचे जुने आणि नवीन असे दोन भाग आहेत ज्यात सरस्वती जुन्या आणि अवेस्ता नवीन काळातील आहेत. अवेस्तातील वेदिंदा या इराणीयन धर्मग्रंथात एकमात्र ठिकाणी हरहवती नाव येते.
२) सिंधू संस्कृती आधीची उपस्थित होती आणि आर्य लोक त्यांना हरवून भारतात आले :
जर आर्य बाहेरून येऊन त्यांनी त्याकाळी अतिशय प्रगत सिंधू संस्कृतीच्या अवैदिक लोकांना हाकलले असते तर त्यांचा उल्लेख ऋग्वेदात असता कारण AIT/AMT म्हणते की आर्यांनी ऋग्वेद भारतात आल्या आल्या (१५०० ख्रिस्तपूर्व) रचला. AIT/AMT म्हणते तसे सिंधू लोक द्राविडी किंवा आ᳴स्ट्रो-एशियाटिक होते, ज्याचे पुरावे नाहीत. वेदात त्यांचे उल्लेख नाहीत म्हणजे आर्यांशी त्यांचा संबंध नव्हता.
AIT/AMT समर्थक म्हणतात की दास, दस्यु, असुर आणि पणि हे सर्व द्राविडी होते पण हीच सर्व नावे युरोपीय संस्कृतीतही दिसतात जिथे द्राविडी लोक कधीच नव्हते. मग AIT/AMT च्या अशा विधानांस अर्थ उरत नाही.
३) सर्व भौगोलिक घटनांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे मार्गक्रमण दर्शवतो. आर्य पश्चिमेकडून भारतात आले आणि अथर्ववेदाच्या रचनेपर्यंत बंगालपर्यंत पोहोचले होते :
ऋग्वेद ज्याभागात रचला गेला तेथील स्थानिक भौगोलिक खाणाखुणांचे रचेत्यांनी (द्रष्ट्यांनी) निरीक्षण करून वर्णनं करून ठेवली आहेत. ऋग्वेदात उल्लेखित या भौगोलिक प्रदेशाचे ३ भागात विभाजन करता येते जसे
१. सरस्वती आणि पूर्वेकडील भाग (याचे संपूर्ण वेदात उल्लेख आहेत) : सरस्वती, दृषद्वती/यव्यवती/हरियुपिया, आपया, अश्मन्वती/अंशुमती/यमुना, गंगा/जाह्नवी इत्यादि नद्या
२. सिंधू आणि पश्चिमेकडील उपनद्या : रसा, कुभा, तृष्टमा, सुवस्तू, अनिताभा, श्वेत्या, कृमु, गोमती, सरयु, मेहत्नु, श्वेत्यावरी, गौरी, सिंधू, सुशोमा, अर्जिक्या इत्यादि नद्या
३. सरस्वती आणि सिंधूच्या मधला भाग : शुतुद्री, विपाशा, असिक्नी, परुष्णी, वितस्ता, मरूद्वृधा इत्यादि नद्या
भाषाशास्त्रज्ञांच्या मते भौगोलिक भागासारखाच कालक्रमानुसार ऋग्वेदातील १० मंडलांच्या रचनेचा एक क्रम आहे जो ६, ३, ७, ४, २, ५, १, ८, ९, १० असा आहे. यात सर्वात जुन्या ६, ३, ७ या मंडलांत केवळ पूर्वेकडील नद्यांचे उल्लेख आहेत आणि तेही वारंवार. दुसऱ्या मंडलात पूर्वेकडील नद्यांचा एकदा आणि १, ८, ९, १० मंडलांत पश्चिमेकडील सर्व नद्यांचे उल्लेख आहेत, दुसऱ्या मंडलात सरस्वतीवर ३ सुक्त असून ते तिचेच नाव घेतात. तिसऱ्या मंडलात भरतवंशी पुरु राजा सुदास् अश्वमेध यज्ञ करून पूर्व, पश्चिम, उत्तरेकडे राज्यविस्तार करतो आणि तेव्हा पुरु लोक पूर्वेकडील २ नद्या ओलांडतात हीच ऋग्वेदात उल्लेख असलेली ऐतिहासिक घटना. यात परुष्णी (रावी नदी) तटावर दाशराज्ञ युद्ध होते आणि तेही असिक्नीच्या (चिनाब नदी) खोऱ्यातील लोकांशी. सुदास् राजाच्या ३ पूर्वजांची माहितीही यात येते ज्यावरून ते आजच्या हरियाणात होते असे निदर्शनास येते. यावरूनच कळते की सुदास् जो स्वतः आर्य होता तो पूर्वेला तर त्याचे शत्रू पश्चिमेला होते.
तेव्हा अश्याप्रकारे AIT/AMT ची ही तिन्ही विधानं अमान्य करता येतात.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com
No comments:
Post a Comment