अश्मयुग
भाग १३
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.
भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील.
पूर्वाश्मयुग
पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.
कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत.



No comments:
Post a Comment