Monday, 18 April 2022

सम्राट अजातशत्रू : मगधच्या विशाल साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ संस्थापक सम्राट

 

सम्राट अजातशत्रू : मगधच्या विशाल साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ संस्थापक सम्राट

(इ. स. पू. ४९३ ते ४६२) 

postsaambhar :Dr Sitaram Ingole 



अजातशत्रू (इ. स. पू. ४९३ ते ४६२) मगधच्या विशाल साम्राज्याचा संस्थापक म्हणूनही अजातशत्रूचा उल्लेख केला जातो.

 बिंबिसारनंतर अजातशत्रू मगधच्या गादीवर आला. त्याने मगधच्या साम्राज्यात भर घातली. मगध राज्यातला तो सर्वश्रेष्ठ सम्राट होय.


अजातशत्रूचा साम्राज्यविस्तार :

 कोसलशी संघर्ष : 

कोसल राजा प्रसेनजित याने त्याची बहीण कोशलदेवीचा विवाह बिंबिसारशी करून काशी या शहराचे उत्पन्न आंदण म्हणून कोसलदेवीला दिले होते. परंतु अजातशत्रूने त्याचा पिता बिंबिसारचा खून केल्याने व कोशलदेवी ही मृत्यू पावल्याने काशीचे उत्पन्न देणे बंद केले. 

प्रसेनजितने अजातशत्रूशी संघर्ष उभा कला. या संघर्षात कधी प्रसेनजित तर कधी अजातशत्रु विजयी होई. निश्चित विजय कोणाचाही होत नव्हता. 

परंतु प्रसेनजितचे अजातशत्रुबाबतचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्याने आपली कन्या वजिराचा विवाह अजातशत्रूशी लावला व पुन्हा काशीचे उत्पन्न अजातशत्रूला दण्याचे मान्य केले. 

याचा परिणाम म्हणून अजातशत्रू व पर्यायाने मगधचे राजकीय वर्चस्व वाढण्यास मदत झाली. 


 वैशालीशी संघर्ष : 

अनेक लहान लहान गणराज्यांचा एक संघ बनवून लिच्छवी हे त्या राज्यसंघाचे पुढारी बनले होते. लिच्छवीची राजकन्या चेल्लनाचा  विवाह बिंबिसारशी झाला होता. म्हणजे चेल्लना ही अजातशत्रूची सावत्र आई होती. 

बिंबीसारच्या मृत्यूनंतर चेल्लना दोन मुले व काही संपत्ती घेऊन वैशालीला आपल्या पित्याकडे गेली. 

अजातशत्रूने वैशालीचा नरेश चेटक यास आपले दोन भाऊ व संपत्ती परत करावी असे सुचविले. पण ती सूचना फेटाळून लावल्याने अजातशत्रू व वैशालीचे राज्य यांच्यात संघर्षाला प्रारंभ झाला. 

लिच्छवीचे गणराज्य हे प्रबळ असल्याने त्याचा पराभव करणे अशक्य होते. म्हणून अजातशत्रूने पूर्वतयारी म्हणून गंगेच्या काठावर लष्करी ठाणे व किल्ला असलेले 'कुसुमपूर' (हेंच ठिकाण पाटलीपुत्र या नावाने पुढे ओळखले गेले व मौर्याची ती राजधानी होती.) हे शहर वसवले. 

चेटकासारखा शक्तिशाली शत्रूचा पाडाव करता यावा म्हणून ३६ राज्यांचा एक संघ त्याने उभा केला. तसेच लिच्छवीच्या गणराज्याचा पाडाव करता यावा म्हणून त्या. गणराज्यात दुहीचे राजकारण करण्यासाठी हेर पाठवले. 

आम्रपाली नावाच्या गणिकेकडून वैशालीच्या गुप्त स्थानांची माहिती करून घेतली. एवढी भक्कम तयारी केल्यामुळेच अजातशत्रू वैशालीच्या लिच्छवी गणराज्यास पराभूत करू शकला.

 परिणामी अजातशत्रूचे वर्चस्व लिच्छवी गणराज्यावर प्रस्थापित झाले त्यामुळे मगध साम्राज्यात फार मोठी भर पडली.


अवंतीशी संघर्ष : 

अजातशत्रू वैशालीशी संघर्ष करण्यात गुंतला असता अवंतीच्या चंडप्रद्योत राजाने अजातशत्रूची राजगृहावर आक्रमण करण्याची तयारी चालविली. 

तेव्हा अजातशत्रूने राजगृह या राजधानीची मजबूत तटबंदी करून घेतली. मगधाची सुरक्षाव्यवस्था त्याने मजबूत केली त्यामुळेच अवंतीशी झालेल्या सत्तासंघर्षात अजातशत्रू विजयी झाला. 

काही इतिहासकारांच्या मते, अवंती मगध असा संघर्ष अजातशत्रूच्या काळात झालाच नाही. तो अजातशत्रूच्या मृत्यूनंतर झाला.


अजातशत्रूचे धार्मिक धोरण : 

अजातशत्रू हा धर्मसहिष्णू सम्राट असावा. जैन परंपरेनुसार त्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता तर बौद्ध परंपरेनुसार त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता.

 'औपत्तिक सूत्र' या जैन ग्रंथात त्याने महावीर वर्धमानपुढे आपल्या धार्मिक निष्ठा व्यक्त केल्या होत्या असा उल्लेख आहे.

 विनयपिटिका व दीर्घनिकायातून अजातशत्रूचे बौद्ध धर्मीयांशी असलेले संबंध स्पष्ट होतात. 

प्रारंभी अजातशत्रूच्या मनात गौतम बुद्धाबद्दल द्वेष, अनादर होता. गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त याच्या मनात गौतम बुद्धाबद्दल असूया असल्याने व त्याची अजातशत्रूशी मंत्री असल्याने त्याने अजातशत्रूच्या मनात गौतम बुद्धाबद्दल गैरसमज करून दिले होते.

 'जीवक' या अजातशत्रूच्या पदरी असलेल्या वैद्याच्या सूचनेवरून अजातशत्रू गौतमाच्या भेटीसाठी आम्रवनात गेला. तेव्हा १२०० बौद्ध भिक्षू अत्यंत शिस्तीत ध्यानस्थ बसलेले त्याला दिसले. हा प्रसंग भारहूतच्या शिल्पकारांनी कोरून ठेवला आहे. या घटनेचा परिणाम होऊन तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. 

बुद्धाच्या भेटीत त्याला परमआत्मशांती लाभल्याने त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

गौतम बुद्धाच्या मृत्यूची वार्ता ऐकून अजातशत्रू कुशीनगर येथे पोहोचला व बुद्धाचे अस्थि अवशेष प्राप्त व्हावेत व त्या अवशेषांवर मी एक स्तूप बांधेल असे त्याने म्हटले. 

त्यानुसार त्याच्याकडे अस्थि अवशेष सुपूर्द करण्यात आले. त्यानुसार त्याने राजगृह येथे बौद्ध स्तूप बांधला. एवढेच नव्हे तर राजगृह येथे वर्णमहाविहार तयार केले. 

अजातशत्रूने गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर इ. स. पू. ४८७ मध्ये राजगृह येथे पहिली बौद्ध धर्म परिषद भरवली. या धर्म परिषदेला ५०० भिक्षू हजर होते. 

महाकश्यप, आनंद, उपाली या बुद्धाच्या ख्यातनाम शिष्यांनी त्यात भाग घेतला. बुद्धाची शिकवण, संदेश यावर परिषदेत चर्चा होऊन त्याचे व्यवस्थित संकलन करण्यात आले. ही परिषद भरवून अजातशत्रू बौद्ध धर्माच्या इतिहासात अमर ठरला आहे. 

याच परिषदेत 'सुत्तपिटक' व 'विनयपिटक' या बुद्ध वचनांचे संकलन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले.


अजातशत्रूचा मृत्यू व त्याचे उत्तराधिकारी : 

अजातशत्रूने नेमके किती व राज्य केले हे निश्चित सांगता येत नाही. पुराणानुसार त्याने २४ वर्षे राज्य केले तर बौद्ध साहित्यानुसार ३२ वर्षे राज्ये केले. 

अजातशत्रू इ. स. पू. ४५९ मध्ये मृत्यु पावला. त्याच्या मृत्यूनंतर ‘दर्शक' हा मगधचा राजा झाला असे पुराणात म्हटले आहे तर जैन व बौद्ध साहित्यानुसार अजातशत्रूनंतर उदायीन हा राजा झाला असे म्हटल आहे. 

अजातशत्रूचा मुलगा दर्शक याने २४ वर्षे राज्य केले असे आहे. अजातशत्रूनंतर उदयभद्र, अनिरुद्ध, मुंड व नागदशक ही चार राजे होऊन गेली. पुराणात त्यांचा कार्यकाळ निश्चित सांगता येत नाही; परंतु या चौघांनीही आपल्या पित्याचा खून करून गादी मिळवली होती. 

त्यांच्या काळात मगध सत्तेचा विकास झाला नाही. उलट अंतर्गत कलहामुळे मगधचे राज्य दुबळे झाले. 

नागदशकच्या अस्तावरोबरच हर्षक वंशाची सत्ता संपली.


 शिशुनाग वंश: 

मगधचे अमात्य व मंत्री हर्षक वंशाचा शेवटचा राजा नागदशक याला सत्तेवरून हटवले व त्याच्या जागी अमात्य शिशुनाग यास मगधच्या  गादीवर बसवले असे 'दीपवंश' व 'महावंश' या ग्रंथात म्हटले आहे. 

शिशुनाग हा वैशालीचा लिच्छवी राजाचा पुत्र होता. शिशुनाग हाच शिशुनाग वंशाचा संस्थापक होता. बौद्ध वाङ्मयात शिशुनाग वंशासंबंधी गौरवपर मजकूर आहे. 

शिशुनागाने विस्तारवादी धोरणाचा पुरस्कार करून अजातशत्रूच्या मृत्यूनंतर जी अस्थिरता निर्माण झाली होती ती दूर केली. 

अवंती, मत्स, कोसल या राज्यांवर पुन्हा त्याने मगधचे वर्चस्व प्रस्थापित केले. जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतावर त्याने मगधचे वर्चस्व व सार्वभौमत्व निर्माण केले.

शिशुनागाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र कलाशोक हा गादीवर आला. त्याने मगधची राजधानी राजगृह येथून पाटलीपुत्र येथे हलवली. त्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराचे मोठे काम केले. त्याच्या काळातच दुसरी बौद्ध धर्म परिषद बोलावली गेली. 

कलाशोक हा 'काकवर्णी' या नावानेही ओळखला जातो. कलाशोकाचा मृत्यू व शिशुनाग वंशाचा अस्त यासंबंधी काही आख्यायिका, लोककथा असून तत्कालीन साहित्यात त्या नोंदवल्या आहेत. 

राजघराण्यातील एका नाभिकाने कलाशोकच्या पत्नीशी संबंध ठेवून कलाशोकाचाही विश्वास संपादन केला. शेवटी कलाशोकचा वध त्याच्या पत्नीनेच केला. 

अशा प्रकारे शिशुनाग वंशाची सत्ता अस्त पावली अशी माहिती 'क्युरोटियस' या ग्रीक इतिहासकाराने नोंदविली आहे. 

पुराणग्रंथात तसेच बाणभट्टाच्या 'हर्षचरित" मध्येही अशाच प्रकारची माहिती आहे. शिशुनाग वंशानंतर मगधवर नंद राजांची सत्ता प्रस्थापित झाली.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...